विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम
पुणे- “शिष्यवृत्ती ही फक्त सन्मान किंवा आर्थिक सहाय्य नसून ती एक बीजरोपणाची प्रक्रिया आहे. हाच बीज पुढे जाऊन यशस्वी उद्योजकाचा वटवृक्ष बनतो,” असे प्रतिपादन बी.एम.सी.सी.चे माजी विद्यार्थी आणि उद्योगपती विशाल चोरडिया यांनी केले. आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात चोरडिया यांनी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने बी.एस.सी.सी. विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी सहा लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले.
स्वर्गीय रघुवीर गोयल यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बी.एम.सी.सी. कॉलेज आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम गुरुवारी (९ ऑक्टो) कॉलेजच्या डॉ. सायरस पुनावाला सभागृहात झाला. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठल मणियार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल मणियार म्हणाले, “बी.एम.सी.सी.चे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच व्यवसायात उतरून यश मिळवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्याचे कार्य चेंबर करत आहे, हे खरोखर प्रशंसनीय आहे.”
चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षात शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार बी.एम.सी.सी. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती फंड स्थापन करण्यात आला. या फंडासाठी शरदचंद्र पवार, विठ्ठल मणियार, गोयल परिवार आणि इतरांनीही आर्थिक सहकार्य दिले. या उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षात, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना व्यवसायात यश मिळवलेल्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५,००० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रा. जे.आर. लांजेकर, प्रा. भारती उपाध्ये या दोन प्राध्यापकांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यानी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दीपक पौडेल यांनी प्रास्ताविक केले, तर चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी चेंबरचे सचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, नवीन गोयल, संदिप शहा, प्रकाश नहार, अशोक अगरवाल, शिवकुमार गोयल, अशोक गोयल, शुभम गोयल, संकेत खिवंसरा, प्रणव गुगळे, प्रा. संजय कंदलगावकर, विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम वेलेकर यांनी केले. प्रा. रेणू पोटे यांनी आभार मानले.

रॅशनल टाईम्स हे डिजिटल बातमी प्रसारित करण्याचे माध्यम श्री.सुनिल चंद्रकांत शेवरे यांच्या मालकीचे असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या रानडे इन्स्टिटयूट वृत्तपत्र व संज्ञापन विभाग येथे पत्रकारि तेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
























